दैवी सूर भूतकाळात घेऊन जातात वीस वर्षापूर्वी राग भैरवीत गायलेलं मिले सूर मेरा तुम्हारा हे गीत पुन्हा मला भूतकाळात घेऊन गेलं. मागचे दिवस आठवल्याने मागच्या आठवणींना उजाळा मिळाला, सर्व काही बदललं, शब्द, सूर मात्र तेच.... ही हूरहूर आजच्या पिढीला लागली नसावी, याला वयाची मर्यादा तर नाहीच नाही, त्या-त्या काळात ते लोकप्रिय गीत ज्याच्या कानावर येतं त्य़ांच्या डोळ्यासमोर गेलेला काळ उभा राहतो. पिढ्यानपिढ्या हे असचं सुरू राहणार आहे.
काही दिवसांपूर्वी रेडिओ सिलोनची सेवा काही तासांनी कमी करण्यात आली तेव्हा वाचण्यात आलं की, साठ, सत्तरच्या दशकात सिलोनवरही “खुश है जमाना आज पहेली तारीख है” हे गाण लावलं जायचं...
कॅटबरीची एक जाहिरात काही दिवसांपूर्वी येऊन गेली. “खुश है जमाना, आज पहेली तारीख है” या गाण्यावर ती जाहिरात चित्रित करण्यात आली होती.
तेव्हा मनात विचार आला की तेव्हाचा विशीतला तरूण आता आजोबा झाला असेल, आजच्या आजोबानं सिलोनवर “खुश है जमाना आज पहेली तारीख है” हे त्या काळचं गाजलेलं गाणं सिलोनवर ऐकल्याने त्यांच्या डोळ्यासमोर सिलोनचा जमाना उभा राहिला असेलचना..
भारतातील रसिक प्रेक्षकांच्या कानसेनांची तहान सिलोनने भागवली.
दुर्दैवाने सिलोनही काळाच्या ओघानं मागे पडलंय, पण सिलोनवरचे गायकांचे ते दैवी सूर आजही कानावर पडले की सिलोनची आठवण होते. पण प्रश्न हा असेलच सिलोन म्हणजे काय? सिलोन हे श्रीलंकेचं जुनं नाव.
श्रीलंकेत सिलोन हे आशियातील सर्वात जुनं रेडिओ प्रसारण केंद्र आहे. टेलिग्राफ विभागाकडून प्रायोगिक तत्वावर हे केंद्र उभारण्यात आलं. तेही युरोपात रेडिओ सुरू होऊन अवघे तीन वर्ष झाल्यानंतर. श्रीलंकेच्या विदेश ब्रॉडकास्ट विभागातून सिलोनचं प्रसारण व्हायचं ते थेट भारतात... मीडियम वेव्हच्या माध्यमातून होत
असल्याने आवाजात खरखर असायची पण सिलोनलाच आता घरघर लागलीय. वर्षाला 2 कोटी रूपये खर्च उचलायची क्षमताही आता सिलोनच्या हिंदी सेवेकडे राहिलेली नाही.
गेल्या वर्षी 1 मे पासून ही संध्य़ाकाळी 7 ते 9 ची सेवा बंद करण्यात आली. आता फक्त सकाळी 05.55 ते 8.30 पर्यंतचं प्रसारण सुरू आहे.
ज्या देशात कुणीही हिंदी बोलत नाही, ती सेवा श्रीलंकेनं आजही कायम ठेवली आहे हे विशेष. 80 वर्षांची सिलोनची सेवा कायम ठेवण्यासाठी भारतीय श्रोते दिल्लीत श्रीलंकेच्या
उच्चायुक्तांना जाऊन भेटलेही आहेत.
काही दिवसांपूर्वीच बजाजच्या स्कूटरची निर्मिती बंद करण्याचा निर्णय कंपनीनं घेतला. तेव्हा बजाजची चित्तरकथा लोकांच्या समोर उभी करण्यासाठी सर्वच वृत्तवाहिन्यांनी “बुलंद भारत की बुलंद तकदीर हमारा बजाज” हे गाणं दाखवलं आणि पुन्हा एक काळ डोळ्यासमोर आला, बजाज स्कूटर खरेदी करण्यासाठी सहा – सहा महिन्याची वेटिंग असायची. घोडागाडीपासून ते दोन चाकांच्या स्कूटरपर्यंत दिवस काढत धावत असताना जीवनाचा वेग काळाच्या ओघात एवढा वाढला की स्कूटरही मागे
पडल्याने मागणी नसल्यानं निर्मिती बंद करावी लागली. गाण्याचे शब्द मात्र खरे ठरले आणि सूर ओळख...
मिले सूर मेरा तुम्हारा या गीतालाही दोन दशक पूर्ण होतील, एका पिढीचा चेहरा बदलला नव्यानं चित्रीकरणात चेहरे बदलले वीस वर्षांच्या काळात अनेक नवे चेहरे समोर आले. दूरदर्शनवर नियमित येणाऱ्या या गाण्यातील सर्व वाक्य घरातील बच्चे कंपनी पुढे-पुढे म्हणत होती. चित्रपटांच्या गाण्यांएवढच हे गीत बच्चे कंपनीत रूळलं होतं. ज्येष्ठांनाही ते पाहायला ऐकायला तेवढचं आवडायचं. भारतातील राज्यांमधील भाषा संस्कृतीच दर्शन त्या गाण्यातून व्हायचं आणि एकमेकांच्या संस्कृती आणि भाषेचा आदर, आकर्षण त्यातून वाढायला मदत झाली. भाषा समजत नसली तरी इतर भाषेतील वाक्यही काहींच्या तोंडपाठ होती.
या गीताची निर्मिती झाली 1988 साली. तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी यांनी राष्ट्रीय एकात्मता मजबूत करण्यासाठी प्रयत्न करायचं ठरवलं. दरम्यानच्या काळात काही सल्लागारांनी दूरदर्शनच्या माध्यमातून संगीतमय आवाहन देशवासीयांपुढे करण्याचा विचार त्यांच्यापुढे ठेवला यातून गीताची निर्मिती झाली.
दूरदर्शनकडून या प्रोजेक्टची जबाबदारी त्यावेळी गाजलेली जाहिरात कंपनी ओगिलवी अँड मेथरला सोपवण्यात आली. त्यावेळी कंपनीचे प्रमुख स्वर्गीय सुरेश मलिक यांना हा प्रकल्प सोपवण्यात आलाय. भारतीय शास्त्रीय संगीत, कर्नाटक संगीत, लोक संगीत आणि आधुनिक संगीताच्या जोरावर देशाच्या एकतेचा प्रसार करण्यासाठी व्हीडीओ गीत बनवण्याचं काम मलिक यांनी हाती घेतलं.
राग भैरवीत हे गाणं बसवण्यात आलं. कंपनीच्या एका युवा मॅनेजरला गीत रचनेचं काम सोपवण्यात आलं. तो अठरा वेळेस असफल झाला पण त्याला अखेर यश आलं. पीयूष पांडेने जेव्हा मिले सूर मेरा तुम्हारा हे गीत ऑफिसमध्ये गायलं
तेव्हा गाण्याचे बोल असेच असावेत अशी पसंती एकोणीसाव्या वेळेस ऑफिसच्या लोकांकडून देण्यात आली. या गाण्याचं वेगवेगळ्या 13 भाषांमध्ये रूपांतर करण्यात आलं. पीयूष पांडे हे आज जाहिरात क्षेत्रात मोठं नावं आहे.
गाण्याची जबाबदारी प्रसिद्ध संगीतकार लुई बैंक्स तसेच स्वर्गीय पी. वैद्यनाथ यांना सोपविण्यात आली. 15 ऑगस्ट 1988 रोजी या गीताचं पहिल्यांदा प्रसारण करण्यात आलं. ज्या दूरदर्शनने हे गीत घराघरात पोहचवलं त्या दूरदर्शनचा अँटेना आता शहरी भागात शोधूनही सापडणार नाही.
सिलोन मागे पडला, भारतानं मागील दोन दशकात
तंत्रज्ञानाच्या बाबतीत मोठी प्रगती केली. भारतीयांमध्ये एकतेचा संदेश देणाऱ्या मिले सूर मेरा तुम्हारा गाण्याला जरी दोन दशक झाली असली तरी दुर्दैवानं या दोन दशकात भारतात मोठ्या प्रमाणात दंगली पेटल्या, मनामनात राष्ट्रज्योत पेटवण्याची तेव्हाची गरज आजही आहे. भाषा, प्रांत यावरून वेगळे होण्याची मागणीही आज मध्येच पेटते. भारतीयांना सूर गवसला का? आपले सूर जुळले का, की एकतेसाठी रचलेले सूर बेसूर झाले? प्रश्न आहेतचं भारतीयांना यापुढे भविष्यात एकतेच्या मधूर सूर मिळवण्याची गरज आहे. “तेच मिले सूर मेरा तुम्हारा” गीताच्या सुरांच्या संगीतमय संदेशातून दिसतंय.